Post Language

Tuesday, September 18, 2018

जीव

पंचवीस वर्षे झाली देश सोडून. अजूनही सुट्टीवर येऊन अमेरिकेला परत जायची वेळ झाली की पाय जड होतात, डोळे
पाणावतात आणि हुंदका  येतो गळ्याशी. अजूनही जीव गुंतलाय इथल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये - चिंचा, आवळे, मस्तानी, वैशाली, तुळशीबाग आणि इतर हजार गोष्टी. भूतकाळातल्या आठवणी कोपऱ्या कोपऱ्यावर भेटतात. तेव्हाचे वास, स्वाद मनात रेंगाळतात. ओळखीच्या रस्त्यावरच्या अनोळखी इमारती सलतात आणि मन शोधत रहाते, जपत रहाते भूतकाळातल्या संकेत स्थळांना. दरवेळी आले की गर्दी- वाहने, माणसे - वाढलेली दिसतात . पण एकदा स्कूटर हातात आली की त्याचा काही फरक पडत नाही. मग परत एकदा पूर्वीप्रमाणेच सिग्नलला सगळ्यांच्या पुढे जाऊन उभे रहाण्याचा खेळ खेळत गावभर फिरते. या वार्षिक भेटीत काही गोष्टी अनिवार्य असतात - सारसबागेचा गणपती, पर्वती, सिंहगड, शनिपार (मुरलीधराचा उसाचा रस तर झालाच पाहिजे) , चितळे, पॅटीस (रविवारी सकाळी), एखादे मराठी नाटक, सिनेमा, गाण्याची मैफल, आणि रात्री उशीरा जीवाशी जीव जोडत जुन्या मैत्रिणीं बरोबर  प्यायलेली कॉफी.
या सगळ्या उपद्व्यापाचे मुख्य कारणच आहे जोडलेला जीव . शहराशी, हवेशी, पदार्थांशी आणि मुख्यतः माणसांशी.
२४-३० तास प्रवास करून परत परत यावंसं वाटतं कारण धागे अजून घट्ट आहेत. वर्ष - दिड वर्ष झाले की अक्षरशः जीव
खेचतो. मग तिकीट काढल्याशिवाय चैनच पडत नाही. प्रवासाचा दिवस येईपर्यंत प्रत्येक संदर्भ हा “इंडिया ट्रिप” शी
निगडीत असतो. जाता येता ऑफिस मधेही प्रत्येकाला “ I am going home.”असं  आवर्जून सांगितले जाते. दोन्ही बाजूच्या
खरेदीच्या याद्या तयार होतात. त्यात कुणा कुणाला काय आवडतं, मागच्या ट्रीपला काय नेले होते, कोण दहावी, बारावी,
graduate झाले आहे असा सखोल अभ्यास होतो. कोणाला नवीन बेबी झाली असेल तर मग खरेदीला वेगळाच उत्साह
येतो. परत येताना काय काय बरोबर आणायचे याची यादी सुरु होते. त्यात मित्र-मत्रिणी, शेजारी -पाजारी, ऑफिस मधले
लोक, नवरा, मुले आणि स्वतः यांचा समावेश असतो. शिवाय मंडळाच्या कार्यक्रमासाठी लागणारे कपडे, दागिने, props
हे असतेच. जाताना चॉकलेट्स  आणि येताना चितळेंची आंबा बर्फी हे अनिवार्य पदार्थ असतात.


सगळी तयारी करून पुण्यात पोचलो (एकदाचे !) की कसं  ‘हुश्श’ होतं . माहेरी जाऊन परत लहान झाल्यासारखं वाटतं.
जबाबदारी नाही, कामाचा दट्ट्या नाही, हक्काने आरामात बसून आयतं जेवायला मिळतं . भावजय काम करू देत नाही, इतकच नाही तर नवे नवे पदार्थ करून खायला घालते आणि मी ही निर्लज्जपणे बसून ताव मारते. आई-वडिलांशी जिव्हाळ्याच्या गप्पा, भावाशी लटके भांडण आणि भाचीशी catch-up करताना दिवस पाऱ्यासारखें उडून जातात. जायचा दिवस उजाडतो आणि नाईलाजाने बॅग भरायला लागते. अजून चार दिवस राहायला पाहिजे होते असे नेहेमीच वाटते. राहिलेल्या भेटी रुखरुख लावतात, लवकर परत यायचे वादे होतात, पाय निघत निघत नाही. जीवाचे तुकडे झाल्यासारखे वाटतात- एक या जगात, एक त्या. उगाच परदेशी स्थायिक झालो असे वाटते. आपल्या माणसांच्या प्रेमाने, जिव्हाळ्याने मन भरून येते. Recharge होऊन परत येते अमेरिकेत माझ्या घरी. कारण जीवाचा एक हिस्सा इथेही विखरून ठेवला आहे - मुलांमध्ये, घरामधे  आणि मित्र-मैत्रिणीं मध्ये.

No comments:

Post a Comment

About Me

Writing has been one of my hobbies since childhood. My poems and pros are a true expression of my thoughts and feelings at that time. My first language is Marathi, so you will find a lot of posts in Marathi. I am planning to add a few more posts monthly. You can subscribe by using your email address. Thanks for visiting!