Post Language

Thursday, March 1, 2018

जाणीव


आपण सध्या सामाजिक घडामोडीच्या मोठ्या वळणावर उभे आहोत असे म्हटले तर गैर ठरणार नाही. Gay rights movement, Black lives matter , MeToo campaign, अशा वेगवेगळ्या चळवळी वेग घेत आहेत. त्यातला राजकीय भाग बाजूला सोडला तर सगळ्याचे सार हे “माणसाकडे माणूस म्हणून बघा ‘ हे दिसते आहे. मानव जात ही “एक” जात आहे आणि प्रत्येक मानवाला समान हक्क आणि समान वागणूक सर्व स्तरावर मिळायला हवी यात गैर काय? कोणी असेही विचारतात की अशा चळवळींची गरज काय? चालायचंच थोडे पुढे मागे, सगळ्यांना सारख्या गोष्टी थोड्याच मिळणार आहेत आयुष्यात? हे खरेच आहे की सगळ्यांना सारख्या गोष्टी मिळणार नाहीत, पण सारखी संधी मिळायला हवीया लेखात महिलांचा विचार केला आहे.

 Feminist movement सुरु झाली १८४८ साली. या वर्षी पहिली  महिला परिषद (women’s conference) अमेरिकेत झाली. Feminism  ची व्याख्या बघितली तर ती  अशी आहे-
Feminism is a belief in the social, economic, and political equality of the sexes. ही एक विचारसरणी आहे. अमेरिकेमध्ये बायकांना मतदानाचा हक्क १९२० साली मिळाला आणि अमेरिकेतली पहिली निवडणूक झाली १७८८-८९ मध्ये. म्हणजे मध्ये १३२ वर्षे गेली. आणि हा हक्क सुध्दा भांडून , निदर्शने करून, झगडून मिळवावा लागला. भारता मध्ये मतदानाचा हक्क स्वातंत्र्यानंतर सगळ्यांनाच सारखा मिळाला. स्त्रियांना कमी दर्जाची वागणूक जगभर पहिल्यापासूनच मिळत आली आहे कारण पुरुषांचे वर्चस्व. आणि वर्चस्व कशामुळे तर फक्त शारीरिक बळामध्ये ते बायकांपेक्षा नैसर्गिकरित्याच सरस आहेत म्हणून. स्त्रियांना ताब्यात ठेवण्याचा पहिला मार्ग म्हणजे शिक्षण न देणे. हा बरेच वर्षे राबविला गेला. त्यामुळे स्त्रियांचा आत्मविश्वास , स्वत्व, स्वतःबद्दलची जाणीव यावर त्याचा दुष्परिणाम झाला. स्त्रियांना स्वतःलाच वाटू लागले कि मला काय कळते आहे? मी बरे आणि माझे काम बरे. काही करून दाखवावे, बनून दाखवावे ही उर्मीच जागली नाही. असा विचार करून बघा कि यात मानवजातीचे किती नुकसान झाले आहे. जे talent सर्वांच्या भल्यासाठी वापरता आले असते ते जोपासले गेले तर नाहीच पण वेळो वेळी दाबले गेले. Social, economic, and political equality of the sexes यात वावगे आहे तरी काय? तरी सुद्धा अजूनही अमेरिकेसारख्या “सुधारित “ first world country मध्ये महिला  president म्हणून निवडून येऊ शकत नाही या सारखी शोकांतिका ती कुठली?

Feminism, women’s lib , women’s empowerment अशा वेगवेगळ्या नावाने स्त्रियांना सामान हक्क आणि संधी मिळावी यासाठीची चळवळ आपल्यापुढे आली. “हे काय नुसते फॅड आहे. काय कमी आहे या बायकांना? चांगल्या मजेत आहेत की!” असे म्हणून तिला धुडकावणारे लोक काही कमी नव्हते आणि नाहीत. यात पुरुष आणि बायका दोघेही आले. हे असे बोलत असतानाच बायकांवरती बंधने घालणे, त्यांना मागे ओढणे, पुरुषांपेक्षा कमी लेखणे, पगार कमी देणे इत्यादी गोष्टी समाजात घडत राहिल्या. कधी संस्कृतीच्या नावाखाली तर कधी सामाजिक अपेक्षा सांभाळण्यासाठी. “करायचे काय मुलीना शिकवून? शेवटी ओट्याशीच उभे राहायचे ना ? “ अशी वाक्ये सुसंस्कृत घरातून ऐकू यायची त्याला फार काळ लोटला नाहीये आणि अजूनही जरा वेगळ्या क्षेत्रात मुलीने जायचा विचार केला कि ह्या सारखीच प्रतिक्रिया  होते. लोक काय म्हणतील ? या बागुलबुवाच्या मागे लपून कितीतरी पालकांनी आपल्या मुलींची स्वप्ने फुलू दिली नाहीत. आणि तरी जर का मुलगी शिकून नोकरीला लागली तर ती नोकरी सुद्धा, घर -दार, सासर-माहेर , सण - वार , मुले -बाळे वगैरे वगैरे सांभाळून केली तर बरी. ह्या विचारसरणीला स्त्रिया पण खत-पाणी घालतात. स्वत:च स्वतः: वर इतकी बंधने घालून घेतात कि विचारू नका. अमुक वेळेला तमुक गोष्ट झालीच पाहिजे , मुलांना चार वेळेला healthy food रोज दिलेच पाहिजे, मागच्या २ वर्षी दिवाळीची पार्टी केली होती, या वर्षी पण केलीच पाहिजे. कोण ठरवते हे सगळे? स्त्रिया का त्यांच्या वरचे संस्कार ? माझी आई असेच करायची , माझी सासू म्हणाली, नवऱ्याची अपेक्षा आहे म्हणून अशी कारणे सांगत आपण किती तरी वेळा स्वतःला इच्छा नसेल तरी, बरे वाट नसेल तरी वेगवेगळ्या गोष्टी करत राहतो. कितीतरी वेळा स्वतःला बाजूला सारत राहतो आणि वर म्हणतो “It’s a thankless job.”


आपली संस्कृती , सामाजिक रचना अजूनही पितृसत्ताकच आहे. समाजाच्या काहीही थरांमध्ये मुलगी आणि मुलगा यातला फरक कमी होताना दिसतो आहे पण अजूनही राजकारण आणि समाजकारणाची सूत्रे पुरुषांच्या हातात आहेत. कितीतरी वेळा मुलींना/ स्त्रियांना ऐकावे लागते की “ ते तुला जमणार नाही.” का जमणार नाही? आणि समजा नाही जमले तर काय होईल? मला प्रयत्न तरी करू देत ना, आधीच कशाला मागे ओढता? कळेल तरी कुठपर्यंत मला जाता येते आहे ते.
Feminism / women’s empowerment याची अजूनही गरज आहे ते यासाठीच. अजूनही स्त्रियांना समान वागणूक मिळत नाही, समान संधी मिळत नाही. त्यांच्या कडून अजूनही समाजाच्या अपेक्षा पुरुषांपेक्षा वेगळ्या असतात. अजूनही एखादी मुलगी किंवा बाई ठाम मते मांडू लागली की तिला आगाऊ ठरवले जाते. हीच गोष्ट पुरुषाने केली की तो त्याचा गुण ठरतो.
MeToo campaign मुळे समाजाच्या गलिच्छ प्रवृत्तीचे प्रदर्शन झाले. स्त्रियांना object म्हणून वापरायची, त्या दृष्टीने त्यांच्या कडे बघायची काही पुरुषांची वृत्ती जगाला दिसली. तरीसुध्दा “इतके वर्षे कशाला गप्प बसल्या ह्या? ह्यांचा काहीतरी फायदा झालाच ना , मग कशाला बोंबाबोंब करतात? “ असे म्हणणारे पुरुष नाही तर बायका सुध्दा पाहिल्या. तुम्ही जर त्या प्रसंगातून गेले नसाल तर तुम्हाला काय हक्क मिळतो असे म्हणण्याचा? जेव्हा समाज मध्ये पुरुषांचे पारडे नेहेमीच जड असते तेव्हा त्यांच्या विरुद्ध पुढे येणे इतके सोपे नसते. पण आनंदाची गोष्ट अशी की एक जण पुढे आल्यावर हिम्मत करून १०० जणी पुढे आल्या, निदान अमेरिकेत तरी. भारतात ह्याचा इतका प्रभाव जाणवला नाही. याचा अर्थ तिथे हे घडत नाही असा नसून, तिथल्या स्त्रिया अजून मोठ्या प्रमाणावर पुढे यायला घाबरतात असा होतो.
हळू हळू नक्की बदल घडतो आहे . अजून बराच टप्पा गाठायचा आहे. आपण सगळ्यांनी सतत प्रयत्न केले तर एक दिवस असा उगवेल कि माणूस फक्त माणूस म्हणून ओळखला जाईल. यासाठी आपल्या मुलींना आणि मुलांना पण वेळोवेळी योग्य मार्गदर्शन द्यायला हवे. आपल्या लक्षात येत नाही पण मुला-मुलींना वागवण्यामध्ये आपण थोडा थोडा फरक करत असतो. या देशात तर रंगांपासूनच सुरुवात होते. मग खेळ वेगळे , खेळणी वेगळी. काय बिघडले जर मुलगी कार आणि ट्रक बरोबर खेळली, आणि मुलगा बाहुली , भांडी-कुंडी खेळला तर? काहीही खेळले तरी त्याने फायदा होणार आहेच. एखाद्या मुलाला ballet मध्ये आवड असेल तर त्याने ते शिकावे. मोठे झाल्यावर घरातल्या कामाची विभागणी लिंगाप्रमाणे ( gender specific) करण्यापेक्षा, कौशल्यावर अथवा आवडीवर अवलंबून असावी. कारचे किंवा दुकानाचे दार मुलाने मुलीसाठी उघडून धरलेच पाहिजे असे नाही. एखाद्या मुलीला किंवा मुलाला ते आवडणारही नाही. छोट्या छोट्या गोष्टीचा बराच मोठा परिणाम व्यतीमत्व विकासावर होतो. मनात आखाडे बांधले जातात. समाजाची आपल्याकडून अपेक्षा काय आहे , कुठल्या प्रसंगात मी कसे वागायला हवे, कसे बोलायला हवे, मी कुठली मते मांडलेली चालतात आणि कुठली मते मी माझ्याजवळच ठेवायची एव्हढेच नाही तर मी काय करू शकते असा सगळा विचार सुरु होतो. या सर्वामागे “ मी मुलगी आहे म्हणून “ फक्त हेच कारण नसावे एव्हढे भान जरी आपण ठेवले तरी ती एक चांगली सुरुवात असेल. मुलींना विश्वास वाटायला हवा की त्या मनात आले तर वाटेल त्या उंचीवर पोचू शकतील . मुलांना कळायला हवे की केवळ “मुलगा “ म्हणून त्यांना मुलींवर वर्चस्व गाजवता येणार नाही. आणि समानता हक्कांची आणि जबाबदाऱ्यांची पण असेल.


No comments:

Post a Comment

About Me

Writing has been one of my hobbies since childhood. My poems and pros are a true expression of my thoughts and feelings at that time. My first language is Marathi, so you will find a lot of posts in Marathi. I am planning to add a few more posts monthly. You can subscribe by using your email address. Thanks for visiting!