इतक्या वर्षांची साठलेली जळमटं काढून
कानाकोपरा स्वच्छ करायचाय
वळचणीत दबा धरून बसलेल्या
वांझोट्या स्वप्नांना
मुळापासून उपटून तडिपार करायचंय
उत्तरं नसलेल्या प्रश्नांचे गुंतवळे,
तळाशी साचलेला भूतकाळाचा गाळ,
वर तरंगणारा असुरक्षिततेचा तवंग
सगळं सगळं निपटून काढायचयं.
कोणी देईल का करून?
नुकत्याच जन्मलेल्या अर्भकासारखं
नितळ, आरस्पानी मन
नव्याने श्रीगणेशा करण्यासाठी.
No comments:
Post a Comment